Blog Detail
जीवनगाणे..!
15 Oct 2024,3:27 AM
D. M. Parshuramkar
पती व पत्नी कायद्याने दोघे वेगळे झाल्यावर त्याने राहतं घर विकायला काढलं. ब्रोकरच्या थ्रू तिच्या वडिलांनीच ते घर विकत घेतलं. पून्हा घराची एक किल्ली त्याच्या हातात देत म्हणाले, मी माझ्या लेकीला ओळखतो तसा तुलाही.. सगळ्या गोष्टी भावनेच्या भरात करतोस, अगदी माझ्या लेकीशी लग्न सुद्धा. पून्हा भावनेच्या भरात एकत्र यावंसं वाटलं तर? तसं व्हायला नको म्हणून ही रिकामी वास्तू तुझ्या हवाली करतो. कधी वाटलं तर येऊन बसत जा, भरल्या घरापेक्षा रिकामं घर जास्त बोलतं आपल्याशी. ! भावनेपेक्षा विचार जास्त ठाम असतात. विचारांवर ठाम झालास तर घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप होणार नाही.. निर्णय ठाम झाला की माझी किल्ली मला परत दे नाहीतर येऊन माझी मुलगी परत घेऊन जा आणि खरच तो ढळत्या दुपारी रिकाम्या घरात बसायला लागला, कलंडणारी ऊन्हं आपल्या घरात अशी ऐसपैस पसरतात त्याला माहीतच नव्हतं.. मावळतीचा वारा आख्ख्या घराचा ताबा घेतो याची त्याला कल्पनाच नव्हती. एक चूकून राहिलेलं कालनिर्णय होतं भिंतीवर हवेमुळे फडफडत होतं. त्या फडफडण्याचा आवाज सुद्धा त्याला नवा होता. त्याने जवळ जाऊन बघितलं, कसल्या कसल्या नोंदी त्यावर तिने करून ठेवल्या होत्या. कसली बीलं देण्याची तारीख, दूधाचा हिशोब, कामवालीचे खाडे, पेस्ट कंट्रोलची तारीख. सिलेंडर संपल्याची तारीख, ग्राहकाचं सामान येण्याची तारीख... इस्त्रीचे कपडे, त्याचा हिशोब या कशातच तो सहभागी नव्हता.. अगदी तिच्या महिन्याच्या तारखा, तारीख पुढे गेली तर त्याला गलबलूनच आलं, या कशा कशातच आपण सहभागी नव्हतो, ती एकटीच डाव खेळत राहीली आणि आपण फक्त तक्रार करत राहिलो, त्याला त्या कालनिर्णय समोर उभं राहणं शक्य होईना, तो बेडरूममधे आला त्याने खिडकी उघडली, खिडकीत तिने हौसेनं लावलेली शेवंती होती, वाळून वाळून झूरायला आलेली, तिला भिजवयला तो आतूर झाला, कातर झाला पाणी घालायला भांड नव्हतं, त्याने कूंडीच सींकमधे नेली यथेच्छ पाणी शिंपडलं. तहानलेली शेवंती गटा गटा पाणी प्यायली आणि तोच तृप्त झाला, तेवढ्यात लॅच कीने दार उघडल्याचा आवाज आला, ती आली होती शेवंतीसारखीच, तिला समोर बघून तो उनमळून गेला, काय अवस्था करून घेतली आहे हिने, हिच्या आयुष्यातलं आपलं स्थान आपल्या लक्षात कसं आलं नाही? कि आपण लक्षात घेतलं नाही? जिद्दीला पेटून भांडते तेंव्हा ती कुठल्याही टोकाला पोहोचते हे काय आपल्याला लग्नाआधी माहीत नव्हतं? दोघांची नजरा नजर झाली, दोघे क्षणभरासाठी स्तब्ध.. ती म्हणाली, मी ही शेवंतीच न्यायला आले होते. तो गलबलून म्हणाला, आत्ताच पाणी दिलंय. तिचं निथळणं संपेपर्यंत थांब ना आणि ती थांबली अगदी कायमची. पाहताक्षणी एखादी व्यक्ती आवडणं हे आकर्षण असतं परत पहावंसं वाटणं हा मोह असतो. त्या व्यक्तिच्या जवळून जाण्याची इच्छा असणं ही ओढ असते त्या व्यक्तिला जवळून जाणणं हा अनुभव असतो आणि त्या व्यक्तीला तिच्या गुणदोषांसह स्विकारणं हेच खरं प्रेम असतं, हेच खरं प्रेम असतं. नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर एकटे राहाल. विश्वास उडाला की आशा संपते आणि काळजी घेणं सोडल की प्रेम म्हणुन विश्वास ठेवा आणि काळजी घ्या... आपल्या जीवनसाथीची व आपल्या कुटुंबाची ..! आयुष्य खुप सुंदर आहे..!
Post Views: 60